शेअर बाजारात सध्या करसवलतीचा फायदा घेण्यासाठी ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम’मध्ये (ईएलएसएस) गुंतवणूक हवी. त्यासाठी तीन वर्षांचा लॉक इन पिरियड असला, तरी या तीन वर्षांत गुंतवणूक ७० ते १०० टक्के वाढण्याची शक्यता असते. या मुद्द्यासह शेअर बाजाराच्या सद्यस्थितीनुसार काही गोष्टींची माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
......
गेल्या आठवड्यात शेअर बाजार पडलेला होता. पुढील आठवड्यात गुरुवारी महावीर जयंती व शुक्रवारी गुड फ्रायडेमुळे बाजार बंद असणार आहेत. त्यामुळे फक्त तीन दिवसच व्यवहार होत राहतील. शुक्रवारी निर्देशांक ३२ हजार ५९६ अंशांवर बंद झाला. निफ्टी नऊ हजार ९९८ अंशांवर थांबला. अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोलाद व अन्य वस्तूंवर आयातकर बसवला. त्याचा परिणाम मेक्सिको व चीनवर मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने चीननेही प्रत्युत्तरादाखल अमेरिकेतील वस्तूंच्या आयातीवर २५ टक्के कर लावला व हा विषय जागतिक व्यापार संघटनेच्या मंचावर नेण्याची धमकीही दिली. दोन प्रबळ अशा या राष्ट्रांच्या साठमारीत भारताला फारसा धक्का बसणार नसला, तरी वातावरण मात्र दूषित झाले आहे, हे स्पष्ट आहे.
त्यातच २८ मार्चला २०१७-१८ हे आर्थिक वर्ष संपेल व पुढचे आर्थिक वर्ष सुरू होईल. हे वर्ष खळबळीचे ठरणार आहे. व्यापारयुद्ध मोठ्या प्रमाणावर भडकले, तर जगातील सर्व शेअर बाजार त्यात होरपळून निघतील. भारतात येत्या काही महिन्यांत राजस्थान, कर्नाटक, वगैरे राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. १५ एप्रिलनंतर दोन महिने कंपन्यांचे मार्च २०१८ तिमाहीचे व पूर्ण वर्षाचे अलेखापरिक्षित विक्री व नफ्याचे आकडेही प्रसिद्ध होतील. बहुतेक कंपन्यांचे हे आकडे सकारात्मक असतील. तरीही खासगी कंपन्या, गृहवित्त कंपन्या, पोलाद कंपन्या, ग्राफाइट कंपन्या यांचे आकडे जास्त उजवे असतील.
बाजार ज्या वेळेला एकाच बाजूने, मग ती तेजी असो वा मंदी, जात असतो, तेव्हा खरेदी विक्रीबाबत निर्णय घेणे सोपे असते; पण डगमगत्या स्थितीत निर्णय घेणे अवघड असते. त्यातच एप्रिलपासून दीर्घमुदती भांडवली नफ्यावरही १० टक्के कर लागणार असल्याने पुढील तीन दिवस विक्रीचा मारा जोरात राहील. भाव खाली येऊ लागतील. त्यामुळे विक्रीतून येणारी रक्कम पडत्या भावात मिळणाऱ्या चांगल्या शेअर्समध्ये पुढील तीन दिवसांत गुंतवायला हवी. पावसाळा सरला, की सप्टेंबरपासून पुन्हा भाव वाढू लागतील.
शेअर बाजारात सध्या करसवलतीचा फायदा घेण्यासाठी ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम’मध्ये (ईएलएसएस) गुंतवणूक हवी. दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम भविष्य निर्वाह निधीत टाकली किंवा ‘ईएलएसएस’मध्ये गुंतवली, तर करदेय रकमेतून वजावट मिळू शकते. ‘ईएलएसएस’मध्ये गुंतवणूक जास्त उत्तम. त्यासाठी तीन वर्षांचा लॉक इन पिरियड असला, तरी या तीन वर्षांत गुंतवणूक ७० ते १०० टक्के वाढण्याची शक्यता असते.
गुंतवणूकयोग्य शेअर :
सध्या मदर्सन सुमी, किवी इंडस्ट्रीज, कंट्रीआय इंडस्ट्रीज, येस बँक यांच्या शेअरचे भाव खूप उतरले आहेत. ‘येस बँके’चा शेअर तर पुढील तीन दिवसांत २६० रुपयांच्या आसपास येईल. या भावात दीर्घ मुदतीसाठी जास्त गुंतवणूक करावी. पुढील तीन वर्षे तो २५ टक्के चक्रवाढ दराने भाववाढ देईल. हेग व ग्राफाइट इंडिया या कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणूक अवश्य हवी.
- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)
(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)